Sunday, January 1, 2023

शेतकरी हा उद्योजक झाला पाहिजे ...... माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे

दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्‍यान आयोजित सिल्‍लोड (औरंगाबाद) येथे राज्‍यस्‍तरीय सिल्‍लोड कृषी महोत्‍सवाचे उदघाटन

पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे. यातुन शेतकरी हा उद्योजक झाला पाहिजे. नवनवीन कृषि तंत्रज्ञान व पिकांच्‍या वाणाचा अवलंब केला पाहिजे, असे मत राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठ विकसित कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक जानेवारी ते जानेवारी दरम्‍यान राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव २०२३ आयोजन करण्‍यात आले असुन या महोत्‍सवाच्‍या उदघाटन मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते झाले त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

रेल्‍वे, कोळसा व खाणी मंत्रालयाचे केंद्रीय राज्‍यमंत्री मा ना श्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्‍यमंत्री (वित्‍त) मा ना डॉ भागवत कराड, राज्‍याचे रोजगार व हमी योजना व फलोत्‍पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्‍हयाचे पालकमंत्री मा ना श्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार, सहकार, इतर मागास बहुजन कल्‍याण मंत्री मा ना श्री अतुल सावे, लोकसभा सदस्‍य खासदार मा श्री सय्यद इम्तियाज जलील, कृषि आयुक्‍त मा श्री सुनील चव्‍हाण, प्रधान सचिव (कृषी) मा श्री एकनाथ डवले, कुलगुरू (वनामकृवि, परभणी) मा डॉ इन्द्र मणि, कुलगुरू (डॉपंदेकृवि, अकोला) मा डॉ शरद गडाख, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.    

मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे पुढे म्‍हणाले की, सन २०२३ हे वर्ष आंतरराष्‍ट्रीय पौष्‍टीक तृणधान्‍य वर्ष म्‍हणुन साजरे करण्‍यात येणार असुन पौष्‍टीक तृणधान्‍य लागवडी खालील क्षेत्र वाढले पाहिजे. पौष्‍टीक तृणधान्‍याचे आहार वापर वाढला पाहिजे, त्‍यात मुल्‍यवर्धन करणे गरजेचे आहे. शेतक-यांनी आधुनिक पध्‍दतीने शेती करून कमी खर्चात जास्‍त उत्‍पादन घेतले पाहिजे. त्‍यासोबत दुग्‍धोत्‍पादन वाढविण्‍यासाठीही प्रयत्‍न केले पाहिजे. शेतीपुरक उद्योग उभारून शेतक-यांनी उद्योगपती बनावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी शासन काम करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित कृषि प्रदर्शनीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या दालनास भेटी देऊन विद्यापीठ विकसित वाण, कृषि अवजारे आणि कृषी तंत्रज्ञानाची पाहणी करून माहिती घेतली. पाच दिवस चालणा-या महोत्‍सवात राज्यातील चारही कृषि विद्यापीठ विकसित संशोधन, नवीन वाण आणि तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार असुन शेतकऱ्यांशी थेट संवाद, विविध चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, कृषि प्रदर्शन आणि विविध शासकीय योजनांची माहिती थेट शेतकरी बांधवा होणार आहे हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. यावेळी राज्‍यभरातुन शेतकरी बांधव, महिला, कृषि विस्‍तारक, कृषि शास्‍त्रज्ञ, कृषिचे विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. पाच दिवस चालणा-या महोत्‍सवात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि.रत्नागिरी) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतक-यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण होणार असुन यात राज्यभरातील विविध प्रयोग यात उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक किड रोग व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके पाहण्‍यास मिळणार आहेत. २०२३ हे वर्ष आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्ष म्हणून साजरे होणार असुन यात महाराष्ट्राची भुमिका, कृषी विभागाचे कार्यक्रम चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. बदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. कृषि प्रदर्शनीत कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग, कृषि निगडीत विविध खासगी कंपन्‍या यांची दालने असुन बाजारपेठांचं नवीन तंत्रज्ञानड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती दालने, कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने, शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालनशेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादने आदींसह महोत्सवात एकूण सहाशे दालने असणार आहेत. सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment