Saturday, September 9, 2023

अन्न पोषण आणि आर्थिक सुरक्षेसाठी भरडधान्य पिके महत्वाची ....... वनामकृविचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि

भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान (ICAR-IIMR), हैदराबाद आणि कृषि शास्त्र, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य: श्री अन्न या २१ दिवसीय‌ प्रशिक्षणास सुरुवात 

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन भाकृअनुप - भारतीय श्री अन्न अनुसंधान संस्थान (ICAR-IIMR), हैदराबाद आणि कृषि शास्त्र, अकोला यांचे संयुक्‍त विद्यमाने भरडधान्य (श्री अन्न): शाश्वत शेती, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास आणि पोषण सुरक्षा साठीचे आदर्श पीक या एकवीस दिवसीय‌ प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक ७ सप्‍टेंबर ते २८ सप्‍टेंबर दरम्‍यान करण्‍यात आली असुन दिनांक   सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषि शिक्षण)  डॉ. आर सी अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे उपस्थित होते. आयआयएमआरचे संचालक डॉ. तारा सत्यवती, कृषि शास्त्र संस्थापक निखिल यादव व सहसंस्थापक कोमल कुटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकरी बांधवांना भरडधान्य हे वरदान असून ग्रामीण भागात हे चांगले उत्पादनाचं साधनं ठरतं आहे, यामुळे महिला आणि तरूण वर्गामध्ये उद्योजकता विकासाला चालना मिळाली आहे. देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षेमध्ये भरड धान्य मोलाची भूमिका बजावत आहेत. संबंधित संस्थाची प्रशंसा करत ते पुढे म्हणाले की, जागतिक भरडधान्य उत्कृष्टता केंद्र हे विविधता, न्याय, परिवर्तनशीलता आणि आरोग्य या चार उद्देश समोर ठेवून देशभरातील भूक कमी करण्यासाठी सदैव कार्यरत आहे. बदलत्या हवामानानुसार जैवतंत्रज्ञान, निवड पद्धती व संकर निर्मिती या माध्यमातून अधिक उत्पादक क्षमता आणि अधिक गुणवत्ता असणारी विविध भरडधान्य पिके जसे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरी, शामुल, कोदरा आदी पिकांच्या विविध वाण विकसित करत आहेत. कृषि शास्त्र, अकोला हे संशोधन ते शेतकरी यांना जोडणारा दुवा म्हणून काम करत आहे.

अध्यक्षीय भाषणात उपमहासंचालक डॉ. आर सी अग्रवाल म्‍हणाले की, देशात विविध प्रकारचे भरडधान्‍य उत्‍पादीत केली जातात. भरडधान्‍य ही आरोग्‍यवर्धक असुन त्‍याचा जनमानसातील आहारात वापर वाढीकरिता प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.

प्रशिक्षणात देशपातळीवर विविध कृषि विद्यापीठ, संशोधन केंद्र व कृषि संस्‍थेतील पाचशे सहभागी नोंदविला असुन भरडधान्य वाण सुधारणा, मूल्यवर्धन, उद्योजकता विकास‌ आणि विक्री, पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य फायदे, बिज उत्पादन केंद्र तसेच संबंधित शेतकरी उत्पादक संस्था आदी बाबी समाविष्ट आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संगप्पा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. व्यंकटेश्वरलू रोंडा यांनी केले.

No comments:

Post a Comment