Sunday, May 11, 2025

भारतीय कृषि शिक्षणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवणे ही काळाची गरज – माजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे प्रतिपादन

 

लातूर, दि. 9 मे 2025 – "कृषि शिक्षण हे केवळ शिक्षणाचे माध्यम नसून, राष्ट्राच्या अन्न, पर्यावरण व आर्थिक सुरक्षेचा कणा आहे. त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये कृषि शिक्षणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील माजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

लातूर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित “कृषि शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण” या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि नियुक्ती कक्षाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब ठोंबरे, चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे,  विभाग प्रमुख डॉ.हिराकांत काळपांडे तसेच ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. व्यंकट जगताप हे मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भाले पुढे म्हणाले, “राज्यातील कृषि शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असली, तरी एकूण उच्च शिक्षणातील त्यांच्या सहभागाचा टक्का अद्यापही समाधानकारक नाही. हा टक्का वाढवण्यासाठी अभ्यासक्रमांचे आधुनिकीकरण, कृषि शिक्षणाला रोजगारोन्मुख बनवणे, आणि समाजात कृषि शिक्षणाची प्रतिष्ठा वाढवणे गरजेचे आहे. कृषि शिक्षण हे एक 'करिअर प्लस समाजसेवा' क्षेत्र बनू शकते.” त्यांनी लातूरच्या कृषि महाविद्यालयाच्या कार्यपद्धतीचे आणि त्यांच्याकडून होत असलेल्या संशोधन, शिक्षण, व पर्यावरण विषयक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, लातूर कृषि महाविद्यालय परिसरामध्ये निर्माण झालेल्या हिरवळीमुळे हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊन लातूर नगरीच्या वैभवात भर पडली आहे. “या महाविद्यालयातून शिकलेले विद्यार्थी निश्चितच यशस्वी ठरतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले की, “महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये कृषि शिक्षणाविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी करिअर मार्गदर्शन, शिष्यवृत्ती योजना, तांत्रिक प्रशिक्षण तसेच यशोगाथांचे सादरीकरण यावर भर दिला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 मध्ये कृषि शिक्षणाला महत्त्व देण्यात आले असून, भविष्यात त्यानुसार अभ्यासक्रम बहुविषयक आणि कौशल्याधारित बनवले जातील.”

या कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी समुपदेशन व नियुक्ती कक्षाचे प्रभारी डॉ. विजय भामरे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. जीवन धोत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सुरज हजारे यांनी केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अच्युत भरोसे, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. अनंत शिंदे, डॉ. राजेश शेळक, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. दयानंद मोरे, डॉ. प्रभाकर अडसूळ, डॉ. सुनिता मगर, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. सुधीर सूर्यवंशी तसेच मोठ्या संख्येने पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते.








No comments:

Post a Comment