Thursday, December 28, 2023

कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर राबवावे.......डॉ. इन्द्र मणी



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विद्यापीठाचे व कृषीचे इतर प्रगतंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणी यांनी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथे केले. कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरच्या सोळाव्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत आयोजित प्रक्षेत्र फेरी दरम्यान ते बोलत होते. या समयी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती वर्षा मारवाळीकर व इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते
 कुलगुरू डॉ. इन्द्र मणी पुढे म्हणाले की कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मच्छी पालन, अंडी उबवणूक, कुकूटपालन शेळीपालन एकक या प्रात्यक्षिकांमधून येथे भेट देणारे शेतकरी पशुपालक बोध तर घेतीलच परंतु कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी हे प्रयोग प्रात्यक्षिक जशास तसे शेतकऱ्यांच्या शेतावर राबवून शेतकऱ्यांचा पशुपालकांचा विश्वास तर द्विगुणित करावाच त्यासोबत त्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे परिसरातील इतर शेतकरी यशस्वी शेतकऱ्यांचे अनुकरण करतील आणि अशा प्रकारे शेतीतील प्रगती साधता येईल. तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर हे तीर्थक्षेत्र श्री तुळजाभवानी शहरालगत असल्यामुळे याला एक वेगळे महत्त्व असून विद्यापीठ या कृषि विज्ञान केंद्राच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षाच्या काळात या परिसराचा चेहरा मोहरा आपण बदलून दाखवू असे ते म्हणाले.
 दरम्यान पहिल्या सत्रात पार पडलेल्या वैज्ञानिक सल्लागार समितीचा समारोप करताना डॉ. इन्द्र मणी म्हणाले की धाराशिव जिल्ह्यातील सर्व सहयोगी विभागांनी, कृषी विज्ञान केंद्राची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सूचना कराव्यात जेणेकरून त्या सूचनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान वाढवून त्यांच्या उत्पादनात देखील दुपटीने वाढ करता येणे शक्य होईल अशा सर्व सूचनांचे आम्ही स्वागत करून त्यांची ताबडतोब अंमलबजावणी करण्याची त्यांनी ग्वाही दिली. वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीच्या प्रारंभी कार्यक्रम समन्वयक प्रा. वर्षा मरवाळीकर यांनी प्रास्ताविक तसेच इतर सर्व शास्त्रज्ञांनी विविध विभागांचे सादरीकरण केले. सदरील बैठकीस वनामकृवि, परभणी चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, धाराशिवचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र माने पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ हुलसुरे जिल्हा पशु सवर्धन अधिकारी डॉ पुजारी व इतर सहयोग विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 सरते शेवटी कृषी विज्ञान केंद्राच्या अतिशय जिव्हाळ्याची असणारी संरक्षक भिंतीचे भूमिपूजन सौ व श्री डॉ. इन्द्र मणी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, विभागाचे श्री दयानंद टेकाळे श्री ढगे, गुत्तेदार श्री बालाजी जाधव, कृषी संशोधन केंद्राचे श्री लतीफ चौधरी तसेच कृषी विज्ञान केंद्राचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ विजयकुमार जाधव, आभार प्रदर्शन डॉ भगवान आरबाड यांनी तर यशस्वीतेसाठी डॉ. भैयासाहेब गायकवाड, डॉ दर्शना भुजबळ, श्रीमती अपेक्षा कसबे, डॉ नकुल हारवाडीकर, श्री बालाजी कुंभार, श्री जगदेव हिवराळे, शिवराज रुपनर, बालाजी कदम, मोरेश्वर राठोड, शत्रुघ्न रनेर आदींनी प्रयत्न केले.

Tuesday, December 19, 2023

Hon. Dr. Indra Mani addressed the National Symposium cum Industrial Meet (NSIM) 2023 at Pune

Dr. Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor of VNMKV, Parbhani, addressed the National Symposium cum Industrial Meet (NSIM) 2023 on 'Agri-business in Alliums: Innovation, Promotion & Sustainability,' organized by the Agricultural Business Incubator (ABI) and Innovation and Technology Management Unit (ITMU) of ICAR – Directorate of Onion & Garlic Research, Pune on 20th December, 2023.

Monday, December 18, 2023

AIU West Zone Vice-Chancellors Meet for the year 2023-24 at Mumbai

 

The Association of Indian Universities (AIU) West Zone Vice-Chancellors Meet for the year 2023-24 on the Future of Work & Skill Development was hosted by Somaiya Vidyavihar University, Mumbai, from December 19-20, 2023. Dr. Indra Mani, Hon’ble Vice-Chancellor of VNMKV, Parbhani, attended the event and actively participated in the discussions.

Saturday, December 16, 2023

विद्यापीठ विकसित गोदावरीच्या प्लॉटवर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची भेट

श्री श्याम शेषराव पठाडे, वरझडी तालुका छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतावरील तुरीचे विद्यापीठ विकसित गोदावरीच्या प्लॉटवर माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची भेट

सदर शेतकऱ्याने कोबी पिकाचे आंतरपीक घेऊन अडीच लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. आणि सध्या कमीत कमी एकरी 15 क्विंटल तूर होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. याबाबतीत मा. कुलगुरू महोदयांनी शेतकऱ्यांच्या शेतावर सहभागी तत्त्वावर संशोधन करण्याची सूचना कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. के टी जाधव आणि डॉ डी के पाटील यांना दिली.

Thursday, December 14, 2023

वनामकृवि आयोजित बाराव्‍या राष्ट्रीय बियाणे परिषदेचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली, आणि राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्याण विभाग, कृषि मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन दिनांक ११ ते १३ डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले होते. सदर परिषदेच्‍या समारोप दिनांक १३ डिसेंबर रोजी झाला. कार्यक्रमा प्रमुख पाहुणे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक  पद्ममभूषण मा डॉ आर एस परोडा होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते. व्‍यासपीठावर आयएसएसटीचे अध्‍यक्ष डॉ डि एस गुप्‍ता, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, आयोजन सचिव डॉ के एस बेग, आयएआरआय विभाग प्रमुख डॉ शिव के यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा डॉ आर एस परोडा म्‍हणाले की, देशातील हवामान हे विविध पिकांच्‍या बीजोत्‍पादनास अनूकुल असुन बियाणे निर्याीतीस भारतास मोठा वाव आहे. देशांतर्गत बियाणाची गरज भागवून आपण अगदी नगण्य अशी बियाणे निर्यात करतो आहोत; दर्जेदार बियाणे निर्मिती करणे हे पहिले धेय्य असेल पाहिजे. बियाणे कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. बियाणे उत्पादन वाढीसाठी पोषक वातावरण असल्याने निर्यातीचीही संधी आहे. बियाण्यांच्या एकुणच विकास आणि विस्तारात शेतकरी प्रथम कसा घेता येईल, यासह आपल्या भविष्यातील अपेक्षा व भुमिका लक्षात घेऊन बियाण्यासाठी रोडमॅप तयार करावा लागेल. शेतकरी वाण सुरक्षा तसेच त्या संदर्भातील नोटिफिकेशनची पध्दती सुलभ करण्याची गरज आहे. बियाणे उद्योग विस्तारासाठी सर्वांनी एकसंघ होऊन काम करावे लागेल. युवकांचा बियाणे उद्योग विस्तारात कसा उपयोग होतो किंवा त्याला कसे प्रोत्साहित करता येईल हे पाहावे लागेल. बियाण्याविषयी समाजाची जागरुकता वाढवावी लागेल. त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतील. बियाणे बदलातील विशेष करुन संकरीत वाणाची बियाणे बदलातील प्रमाण अत्यंत कमी असल्याचे डॉ. पराडा म्हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि म्हणाले की, कृषि क्षेत्राचा विकास करण्यासाठी चार गोष्टीची आवश्यकता लागते यात कृषि शास्त्रज्ञ, कृषि उद्योजक,  शेतकरी आणि सरकार या चार क्षेत्रातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. डॉ. यादव यांनी तांत्रिक क्षेत्रातील महत्वाच्या मुदयाचा उभा करुन सुचविलेल्या शिफारसीची माहिती दिली. प्रास्‍ताविक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डी जी मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ के एस बेग यांनी केले.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे (वनामकृवि) कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची बदलत्या हवामान स्थितीत नवसंशोधन व दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी निर्माण झालेली आव्हाने ही संकल्पना होती.परिषदेत उत्तम सादरीकरण करणा­यांना तसेच पोस्टर स्पर्धकांना या वेळी गौरविण्यात आले. परिषदेच्या आयोजनासाठी निमंत्रक ‘वनामकृवि’ चे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, आयोजन सचिव कापुस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्यांनी या परिषदेसाठी परिश्रम घेतले. तीन दिवसीय सदर परिषदेस देशाचे व राज्याचे कृषि शास्त्रज्ञ, बियाणे उद्योजक, प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याचे प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी आदींनी सहभाग नोदंविला होता. परिषदेमध्ये एकूण सहा तांत्रिक सत्रांमध्ये व तीन समूह चर्चा सत्रांमध्ये बियाणे विषयक विविध विषयांवर संशोधन व तंत्रज्ञाना संबंधी शास्त्रज्ञांचे सादरीकरण व चर्चा झाली.


Sunday, December 10, 2023

बाराव्‍या राष्‍ट्रीय परिषदेचे उदघाटन

दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी संशोधना सोबतच निधीची ही आवश्यकता .... डॉ. मंगला राय यांनी राष्ट्रीय बियाणे परिषदेत व्यक्त केल्या भावना

छत्रपती संभाजीनगर येथे बाराव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ परभणी आणि इंडियन सोसायटी टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नॅशनल सीड रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, वाराणसी यांच्या सहकार्याने कृषी व शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंगला राय म्हणाले की, बदलत्या हवामानानुसार बियाणे संशोधनाची दिशाही बदलावी लागेल आणि यासाठी निधीची देखील गरज भासणार आहे. आपल्या देशात जगाच्या 18% लोकसंख्या आहे त्यामुळे या सर्व नागरिकांच्या समतोल आहार सोबतच जीवनमान उंचावणे याचे नक्कीच मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. यासाठी देशातील सर्व संशोधन संस्थांनी समन्वयाने काम करत काळानुरूप संशोधन करण्याची गरज आहे. यामुळे नक्कीच आपल्या संशोधनाचा गौरव वाढण्यास मदत होईल. या परिषदेचे प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी केले. आपला मराठवाडा विभाग हा बदलत्या हवामानाच्या कचाट्यात सापडत आहे, कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाऊस यामुळे हातात आलेली पिके शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. त्यामुळे नेमकी यासाठी कशा प्रकारचा संशोधनाची दिशा लागेल याची दिशा ठरणारी ही बैठक राहील असं मला विश्वास आहे. पुढील दोन दिवस शेतकरी बांधवांना उपयोग होणारी सर्व चर्चा होईल अशी मला संशोधकाकडून अपेक्षा आहे. या परिषदेतून भविष्यातील शेती संशोधन कशा प्रकारचे असावे यासाठी नक्कीच दिशा देणारे राहील याची मला खात्री आहे. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी भाषने केली, त्यामध्ये प्रामुख्याने देशातील एकंदरीत बदलते हवामान आणि त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान यासाठी विभागवार विद्यापीठाने पुढाकार घेत योग्य ते संशोधन निर्मिती करण्याची गरज आहे. यामध्ये साधारणता: पिकाच्या कालावधीचा विचार करून आपापल्या हवामानाचा विचार करत योग्य ते संशोधन शेतकऱ्याला कसे सोयीचे होईल याचा विचार करणे गरजेचे आहे अशा एकंदरीत सर्वच मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त केल्या. या कार्यक्रमांमध्ये विशेषतः पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी अतिशय आवेशपूर्ण असे भाषण केले. त्या म्हणाल्या की, मी कुठली शाळा शिकलेली नाही पण आज माझा शेतीविषयाचा अनुभव बघता कृषी पदवीधर देखील माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी येतात आणि कार्यक्रम संपल्यानंतर माझे फोटो काढत आहेत. त्यांना माझी एकच विनंती की, माझ्यासोबत फोटो काढण्याऐवजी तुम्ही माझ्या विचाराची कास धरत शेती करावी असे शेवटी म्हणाल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी. जी. मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर केंद्रीय कृषी आयुक्त भारत सरकार डॉ. पी.के. सिंग, माजी अध्यक्ष कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ डॉ. सी. डी. मायी, डॉ. एच. एस. गुप्ता, आयएसएसटी, डॉ. एस. ए. पाटील माजी संचालक भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली डॉ. बीजेन्द्र सिंग, आचार्य नरेंद्र देवा कृषी विद्यापीठ, आयोध्या श्री अजय राणा, एफएसआयआय, नवी दिल्ली श्री. राजू बारवाले, चेअरमन महिको ग्रुप, मुंबई बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे, प्रयोगशील शेतकरी हरियाणा पद्मश्री कंवल सिंग चव्हाण डॉ. डी. के. श्रीवास्तव, सह आयुक्त गुणवत्ता नियंत्रण, भारत सरकार, नवी दिल्ली, डॉ. डी. पी. वासकरसंचालक संशोधन तथा संयोजक इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या परिषदेसाठी देशभरातील शास्त्रज्ञासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधकांची मोठी उपस्थिती लाभली.