Friday, February 7, 2025

सावरगाव (हडप) येथे कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी विशेष शेतकरी मेळावा संपन्न

अधिक नफ्यासाठी विक्री व्यवस्थापनाची कला शेतकऱ्यांनी आत्मसात करावी... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि खरपुडी (जालना) येथील कृषि विज्ञान केंद्र-१ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दिनांक ७ फेब्रुवारी रोजी कापूस पिकाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन मौजे सावरगाव (हडप), जालना येथे करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव, कृषि रत्न माननीय श्री विजय अण्णा बोराडे उपस्थित होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संशोधन समिती सदस्य व सल्लागार श्री दादा लाड, कृषि उपसंचालक श्री कायंदे, विशेष कापूस प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. अर्जुन तायडे, शास्त्रज्ञ डॉ. सुनील महाजन, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उद्घाटनपर भाषण करताना शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, "उत्कृष्ट शेतीमधूनच भविष्यातील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. शेतकऱ्यांसाठी कार्य करण्याची ईश्वरीय शक्ती आपल्याला मिळालेली आहे. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्य करत आहे." त्यांनी पुढे सांगितले की, शेतीमध्ये उत्पादकतेपेक्षा आर्थिक नफा किती झाला याकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच, अधिक नफा मिळवण्यासाठी विक्री व्यवस्थापनाची कला शेतकऱ्यांनी आत्मसात करावी. महाराष्ट्रातील कृषि विकासासाठी दूरदर्शी धोरणे आवश्यक असून, कै. वसंतरावजी नाईक यांनी हवामान विभागानुसार चार कृषि विद्यापीठांची स्थापना करून शेती क्षेत्राला मोठी चालना दिली. त्यामुळे कृषि शिक्षण आणि मनुष्यबळाचा विकास घडून आला. कृषि शिक्षण क्षेत्राला उद्योगांशी जोडण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या मेळाव्यात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. हा शेतकरी मेळावा अत्यंत यशस्वी झाला असून, शेतकऱ्यांनी या माध्यमातून कापूस शेतीबाबत महत्त्वाची माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन मिळवले.


Monday, February 3, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची सोमनाथपूर कृषि संशोधन केंद्रास भेट: संशोधन विस्तारास महत्त्वपूर्ण दिशा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सोमनाथपूर (ता. उदगीर) येथील कृषि संशोधन केंद्राला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भेट दिली. या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि  लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मोहन धुप्पे यांची उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलगुरूंनी करडई व ज्वार संशोधन प्रयोग तसेच हरभरा पिकाच्या बीजोत्पादनाची प्रत्यक्ष पहाणी केली. संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संशोधनाच्या भविष्यातील दिशेबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या. या केंद्राला गळीत धान्य संशोधन केंद्राशी सलग्न करून सूर्यफुल बियाणे उत्पादनासाठी 'सूर्यफुल सिड हब' उभारून शेतकऱ्यांना अधिकाधिक दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे. केंद्रातील उपलब्ध जमिनीवर फळ पिकांची लागवड, याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने भाजीपाला व फळपिकांच्या रोपवाटिकेची उभारणी करण्यास सांगितले.

प्रभारी अधिकारी श्री सुधीर सुर्यवंशी यांनी संशोधन केंद्रात सुरू असलेल्या विविध संशोधन प्रकल्पांची माहिती सादर करून मान्यवरांचे आभार मानले. माननीय कुलगुरूंच्या भेटीचे यशस्वी आयोजनसाठी  श्री भ. ह. कांबळे, श्री अमोल सुनेवाड, श्री चंद्रकांत चव्हाण आणि श्री वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.




वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची हंडरगुळी (ता.उदगीर) करडई पीक प्रात्यक्षिकास भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील अखिल भारतीय तेलबिया संशोधन संस्थे अंतर्गत मौजे हंडरगुळी (ता.उदगीर) घेण्यात आलेल्या करडई पीक प्रात्यक्षिकास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक 3 फेब्रुवारी भेट दिली. त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. मोहन धुप्पे, सरपंच श्री ज्ञानेश्वर गायकवाड, करडई उत्पादक तथा प्रगतशील शेतकरी श्री सतीश काळे, श्री कल्याण पाटील, श्री विजय आंबेकर आदी उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि करडई उत्पादनाचे महत्व सांगितले. शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या आंतरपीक पद्धतीचेही त्यांनी कौतुक केले. याबरोबरच दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता नियमित सुरु असलेल्या विद्यापीठाच्या ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होवून माहिती घेण्याचा आणि शास्वत शेतीसाठी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान आणि कृषि सल्ला अवलंबन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.  भेटी दरम्यान हंडरगुळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचा ब्रँड तयार करावा !... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर स्थित पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन या संस्थेस माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांनी दिनांक ३ फेब्रुवारी रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. मोहन धुप्पे उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांनी  महाविद्यालयातील शैक्षणिक, संशोधनात्मक आणि विस्तार कार्याचा आढावा घेतला. या पदव्युत्तर संस्थेतून अभ्यास करणारे विद्यार्थी भविष्यात उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजेत. यासाठी विद्यार्थ्यांनी कृषि मालाचे उत्पादन व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्थापन यामध्ये प्राविण्य मिळवायला हवे. त्या अनुषंगाने संस्थेकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर फळ पिकांची लागवड करावी. तसेच फळ उत्पादन आणि प्रक्रिया पदार्थ वितरित करून संस्थेचा ब्रँड तयार करावा. हे कार्य विद्यार्थ्यांद्वारे करून घ्यावे व त्यांना अनुभवातून शिक्षण द्यावे. याबरोबरच खर्चामध्ये बचत होण्याच्या दृष्टीने संस्थेमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती यंत्रणा बसवावी. या बचतीचा लाभ विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी वापरावा असे सूचित केले.

अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी संस्थेतील उपक्रमांची माहिती सादर करून मान्यवरांचे आभार मानले.